Maharashtra Politics : राजकीय पक्षांचे चिन्हच झाले गायब; स्थानिक आघाड्यांच्या चिन्हावरच लागली मोहर (फोटो - iStock)
कोल्हापूर / दीपक घाटगे : कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक ठिकाणी गोटबाजी, स्थानिक घराणेशाही आणि वैयक्तिक संबंधांवर आधारित आघाड्या उभ्या राहत असून या सर्वांमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे पक्षांची अधिकृत चिन्हे जवळजवळ गायब झाली आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रमुख पक्षांचे झेंडे, गाणी, प्रचार साहित्य आणि प्रतीके गाजत असतात; मात्र, स्थानिक निवडणुकीत हीच पक्षनिष्ठा पातळ होऊन पूर्णपणे स्थानिक आघाड्यांच्या रंगाने रंगलेली दिसत आहे.
या निवडणुकीत मोठ्या पक्षांच्या नेतृत्वांनी गाठीभेटी, समन्वयक बैठकांचा कितीही आग्रह धरला. तरी उमेदवार मात्र आपल्या गावातील समीकरण पाहूनच निर्णय घेताना दिसत आहेत. मागील काही दिवसांत जिल्ह्यातील बहुतेक नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. कुठे दोन गट एकत्र आले तर कुठे तीन गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस या पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते एकाच पॅनेलमध्ये एकत्र आले आहेत, तर काही ठिकाणी त्याच पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध जोरदार टक्कर देताना दिसत आहेत.
हेदेखील वाचा : ‘2014 मध्ये काँग्रेसचा झालेला पराभव नियोजित होता?’; माजी खासदार कुमार केतकर यांनी केले धक्कादायक आरोप
लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत कमळ, पंजा, धनुष्य-बाण, मोर, घड्याळ यांसारखी चिन्हे ठळकपणे झळकतात. मात्र, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत या चिन्हांना स्थान नसल्याने मतदारांना आता “सायकल”, “बाटली”, “दिवा”, “कुंडी”, “टेबल”, “खुर्ची” अशा विविध निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हांवर नजर ठेवावी लागली आहे. पक्षनिष्ठ मतदारांनाही आता “पक्ष नाही तर उमेदवार” असा विचार करावा लागत असून, चिन्ह न बदलता उमेदवार शोधण्याचे आव्हान मतदारांसमोर उभे ठाकले आहे.
वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये कार्यकर्ते सामील
जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी विकासकामे, पाणी योजना, रस्ते, ड्रेनेज, गटार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर या निवडणुकांची लढाई केंद्रीत झाली आहे. पक्षीय घोषणापत्रांपेक्षा उमेदवारांची वैयक्तिक प्रतिमा, स्थानिक पातळीवरील कामे, कुटुंबाची ओळख आणि त्यांचा परिसरातील प्रभाव अधिक महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे अनेक दशकांपासून एखाद्या पक्षाशी निष्ठा ठेवणारे कार्यकर्ते सुद्धा या वेळी वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये सामील झाले आहेत. काही ठिकाणी तर परंपरागत प्रतिस्पर्धी आता एकाच पॅनेलमध्ये उभे राहून “एकदिलाने सत्ता स्थापन” करण्याचे प्रयत्न करताना दिसतात. विचारधारेवर नव्हे, तर वैयक्तिक समीकरणांवर भर अधिक आहे.
पक्षांची चिन्हे नसल्याने वयोवृद्ध आणि ग्रामीण भागातील मतदार गोंधळले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याउलट तरुण मतदार आणि प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांमध्ये या निवडणुकीबद्दल मोठी उत्सुकता दिसून येत आहे. ते पक्षापेक्षा उमेदवारांच्या कामगिरीला प्राधान्य देत असून, “कोण काम करणार?” हा मूलभूत प्रश्न विचारत आहेत. सोशल मीडियावरही प्रचाराला मोठे महत्त्व मिळत असून, व्हिडिओ, पोस्टर्स, पॅनेलची जाहिरात मोठ्या प्रमाणात फिरत आहे.
हेदेखील वाचा : Dharashiv News: धाराशिवमध्ये ८ नगरपरिषद निवडणुका: २८७ केंद्रांवर होणार मतदान, ३ डिसेंबरला निकाल






