या मालिकेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ च्या पॉईंटस टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. सलग दोन विजयांनंतर बांगलादेश संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे, तर भारत सहाव्या स्थानावर घसरला आहे. भारताचे PCT म्हणजेच गुण टक्केवारी ४८.१५ आहे, तर बांगलादेश ५८.३३ PCT वर पोहोचली आहे. पाकिस्तान संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यांचे PCT ८.३३ आहे. ऑस्ट्रेलिया सध्या ८७.५० PCT सह अव्वल स्थानावर आहे, तर न्यूझीलंड दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. डब्ल्यूटीसी पॉईंटस टेबलमध्ये संघांना गुणांनुसार नव्हे, तर टक्केवारीनुसार स्थान दिले जाते.
बांग्लादेशने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान आणि भारत दोघांनाही WTC 2026-27 पॉईंट्स टेबलमध्ये धक्का बसला आहे. आता भारतीय संघासाठी आगामी कसोटी मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अफगानिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळणार आहे. परंतु, याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्राचा भाग असणार नाही. यानंतर, टीम इंडिया श्रीलंका आणि न्यूझीलंडचा दौरा करेल, जिथे प्रत्येकी दोन कसोटी सामने खेळले जातील.
A brilliant final day performance sees Bangladesh come out on top and complete a 2-0 series sweep against Pakistan 💪
#WTC27 📝: https://t.co/sOHU6hTWiK pic.twitter.com/pJAtDZUj8j — ICC (@ICC) May 20, 2026
दुसऱ्या कसोटीत सामन्यात, बांग्लादेशने पहिल्या डावात २७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ २३२ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर बांग्लादेशने दुसऱ्या डावात ३९० धावा करून पाकिस्तानसमोर ४३७ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला केवळ ३५८ धावाच करता आल्या आणि ते ७८ धावांनी सामना हरले. लिटन दासला सामनावीर, तर मुशफिकुर रहीमला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.






