१५ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. वैभव सूर्यवंशीला आगामी मालिकांमध्ये पदार्पणाची संधी मिळाल्यास तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल. सध्या हा विक्रम ‘गॉड ऑफ क्रिकेट’ सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने पाकिस्तानविरुद्ध वयाच्या १६ वर्षे आणि २०५ दिवसांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मात्र वैभव सध्या केवळ १५ वर्षे आणि ७१ दिवसांचा असल्याने तो हा ऐतिहासिक विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे.
भारतीय संघात आधीच अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनसारखे आक्रमक सलामीवीर असल्यामुळे वैभवला अंतिम अकरामध्ये संधी मिळेल का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे संघ व्यवस्थापन त्याच्यावर मोठा विश्वास दाखवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी वैभवच्या निवडीमागील कारण स्पष्ट करताना सांगितले की,’ वैभव सूर्यवंशीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आम्हाला त्याची निवड करण्यास भाग पाडले. सलग दोन आयपीएल हंगामांत त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. पुढे मोठी आव्हान कठीण असतील, पण त्याने उत्कृष्ट कामगिरी करत स्वतःला सिद्ध केले आहे.’
ते पुढे म्हणाले की, ‘तो अजून खूप लहान आहे आणि त्याचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे. देशांतर्गत हंगाम सुरू झाल्यावर आम्ही त्याचा खेळ पाहू . मात्र सध्या टी-२० संघासाठी काय योगदान देऊ शकतो, यावर आमचे लक्ष आहे.’
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी वैभवच्या भविष्यासंदर्भात सावध भूमिका घेतली असल्याचे म्हटले आहे. ‘ते म्हणाले,आम्ही वैभवच्या भविष्याबद्दल खूप सावध आहोत आणि त्याचा प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.’
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. त्याने १४ सामन्यांत तब्बल ७७६ धावा करत ऑरेंज कॅप जिंकली. यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा सामवेश आहे. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट तब्बल २३७.३१ इतका होता. जसप्रीत बुमराह, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध त्याने निर्भीड फलंदाजी करत सर्वांना प्रभावित केले.
Presenting #TeamIndia‘s T20I squads for the tours of England & Ireland 2026 🇮🇳#ENGvIND | #IREvIND pic.twitter.com/f84kSSAIDf — BCCI (@BCCI) June 6, 2026
भारताचा संघ २६ आणि २८ जून रोजी आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर, टीम इंडिया १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सामने १, ४, ७, ९ आणि ११ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर १४ जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार असून अखेरचा सामना १९ जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. तसेच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांमध्ये भारत विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.






