PAK vs AUS: कांगारू ढेपाळले! पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ; 2-1 ने मालिका घातली खिशात
अफगाणिस्तानच्या अनियमित कसोटी वेळापत्रकाबाबत, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रिचर्ड पायबस म्हणाले की,’ जेव्हा एखाद्या देशाला पूर्ण सदस्यत्व मिळते, तेव्हा त्याला नियमित सामन्यांचीही गरज असते. एक कसोटी सामना खेळून पुढच्या सामन्यासाठी सहा महिने वाट पाहणे योग्य नाही. असे होऊ शकत नाही की, केवळ विश्वचषकात संधी मिळाली म्हणून संघाचा विकास फक्त त्यावरच अवलंबून राहील. संघाचे प्रगती कायम ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण क्रिकेट आवश्यक आहे. हा प्रश्न आयसीसीला विचारला पाहिजे, अफगाणिस्तानला नाही.’
ते पुढे म्हणाले की, ‘मला नाही वाटत की २० वर्षांपूर्वी कोणी कल्पना केली असेल की अफगाणिस्तान इतक्या वेगाने विकसित होईल. जेव्हा या मालिका दोन सामन्यांच्या होणार होत्या, तेव्हा मला ते अजिबात समजत नव्हते. कोणत्याही संघाला अनिर्णित मालिका खेळायला आवडत नाही. कसोटी मालिका फक्त तीन किंवा पाच सामन्यांचीच असावी. तरच मालिकेचा काही निकाल लागू शकतो.’
अफगाणिस्तानला २०१७ मध्ये आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व मिळाले. त्यानंतर या संघाने २०१८ मध्ये बंगळूरु येथे भारताविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला. मात्र, तेव्हापासून अफगाणिस्तानने केवळ १२ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी पाच सामने जिंकले असून सात गमावले आहेत. २०२६ मध्ये देखील अफगाणिस्तान त्यांचा पहिला कसोटी सामना देखील भारताविरुद्धच खेळणार आहे.
जून २०२६ मध्ये भारताविरुद्ध एकच कसोटी सामना खेळल्यानंतर , अफगाणिस्तान ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धही एकच कसोटी सामना खेळेल. संघाचा पुढचा कसोटी सामना मार्च २०२७ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध होईल. याच कारणामुळे अफगाणिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकाने संघाच्या कसोटी वेळापत्रकावरून आयसीसीवर टीका केली आहे. अफगाणिस्तानने आपला शेवटचा कसोटी सामना ऑक्टोबर २०२५ मध्ये खेळला होता. याचा अर्थ, भारताविरुद्धच्या सध्याच्या सामन्यापूर्वी संघ अंदाजे आठ महिने कसोटी क्रिकेटपासून दूर राहिला आहे.






