सौजन्य - नवराष्ट्र टीम
ऑनलाइन प्रणालीतील बिघाडामुळे फॉर्म सबमिट होत नाहीत, तर काही विद्यार्थ्यांचे शुल्क भरूनही अर्ज रिजेक्ट झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे, अशा विद्यार्थ्यांना अद्याप फी परतावा (रिफंड) मिळालेला नाही. पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यापीठात येत असून, महाविद्यालयांकडून स्पष्ट मार्गदर्शन मिळत नसल्याने सर्व विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठाकडे पाठवले जात आहे.
दरम्यान, पुढील १५ दिवसांत परीक्षा सुरू होणार असताना अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म अद्याप अपूर्ण राहिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ABVP चे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शाखा अध्यक्ष तनिष्क शेळके यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी परीक्षा विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून, पुढील दोन दिवसांत सर्व समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
परीक्षा शुल्क माफीची घोषणा फक्त कागदावरच, विद्यार्थ्यांना परतावा नाहीच
राज्यात नैसर्गिक आपत्ती, महामारी किंवा इतर संकटांच्या काळात विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून परीक्षा शुल्क माफीच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. स्टूडंट हेल्पिंग हँडस संस्थापक अँड. कुलदिप आंबेकर यांनी सांगितले की, “विविध महाविद्यालय आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून पूर्ण परीक्षा शुल्क आधी वसूल केले जात असून, नंतर परतावा दिला जाईल असे सांगितले जाते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना हा परतावा मिळालेला नाही. महाविद्यालयाच्या नोटीसनुसार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शुल्क माफी लागू होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळे परीक्षा शुल्क माफी योजना केवळ घोषणांपुरती मर्यादित राहत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांवर याचा अधिक परिणाम होत असल्याचेही समोर आले आहे.






