सांगलीत पुन्हा गुंडाराज ! हमाल पंचायतच्या नेत्याला संपवण्याचा कट; सापडले नाहीत म्हणून थेट नातवावर गोळीबार
सांगली : शहरातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून हमाल पंचायतचे नेते बाळासाहेब बंडगर यांना ठार मारण्यासाठी आलेल्या संशयितांनी ते हाती न लागल्याने त्यांच्या अवघ्या १४ वर्षीय नातवावर गोळी झाडून त्याचा निर्घृण खून केला. या थरारक घटनेमुळे सांगली शहर हादरून गेले असून कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अभयनगर येथील एसटी कॉलनी परिसरात बुधवारी (दि.10) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वेदांत मारुती बंडगर हा घराच्या पोर्चमध्ये मोबाईल पाहत बसला असताना संशयित निलेश गडदे व त्याचे साथीदार तेथे आले. हातात पिस्तूल घेऊन आलेल्या गडदेने बाळासाहेब बंडगर यांचा शोध घेतला. मात्र, ते समोर न आल्याने संतापाच्या भरात त्याने निष्पाप वेदांतवर पिस्तूल रोखून त्याच्या उजव्या डोळ्यात गोळी झाडली. गोळी लागताच वेदांत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय धावत बाहेर आले. गंभीर जखमी झालेल्या वेदांतला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. एका निष्पाप बालकाचा गोळी झाडून खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या मालधक्का ठेक्यावरून दोन गटांत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून संशयित गडदे याने संबंधित ठेकेदाराला धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर हमाल पंचायतचे नेते बाळासाहेब बंडगर यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा राग मनात धरून गडदेने त्यांना लक्ष्य केल्याची माहिती समोर येत आहे.
खुनाचा गुन्हा यापूर्वीही होता दाखल
विशेष म्हणजे संशयित निलेश गडदे याच्यावर यापूर्वीही खुनाचा गंभीर गुन्हा दाखल असून, तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर शहरात प्रवेशबंदी असतानाही तो साथीदारांसह सांगलीत पोहोचल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
गुंडाराज संपवण्यासाठी कठोर कारवाई करा
घटनेनंतर संशयित फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. निष्पाप वेदांतच्या मृत्यूने बंडगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे. “गुंडाराज संपविण्यासाठी कठोर कारवाई करा,” अशी मागणी नागरिकांतून होत आहे.






