शाळेत धक्कादायक प्रकार! 8 वर्षांच्या चिमुकल्याला गळ्याला पकडून उचलले अन्...; मुख्याध्यापकाची क्रूर वर्तणूक, पालक संतप्त
School Violence: अहिल्यानगर शहराजवळील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत मुलांनी दंगा केल्यास शिक्षकांकडून समज देणे किंवा सौम्य शिक्षा देणे ही सामान्य बाब मानली जाते. मात्र, एका शाळेच्या मुख्याध्यापकाने इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याशी अमानुष वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील काही विद्यार्थ्यांमध्ये आपापसात भांडण सुरू होते. त्यावेळी संबंधित आठ वर्षीय विद्यार्थ्याने ही बाब आपल्या वर्गशिक्षिका ज्योती मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वर्गशिक्षिकांनी शाळेचे मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावले. मुख्याध्यापक वर्गात आल्यानंतर त्यांनी भांडण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कान पिळले, त्यानंतर “भांडण कसे करतात ते मी दाखवतो,” असे म्हणत त्यांनी तक्रार करणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा गळा पकडून त्याला वर उचलले. त्यानंतर खाली उतरवून त्याच्या हाताला चावा घेतला.
शाळेतून घरी परतल्यानंतर विद्यार्थ्याने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलाच्या हातावरील जखम पाहून पालकांना धक्का बसला. त्यांनी तातडीने शाळेच्या मुख्याध्यापकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून याबाबत जाब विचारला. पालकांच्या म्हणण्यानुसार, मुख्याध्यापकांनी “माझ्याकडून चुकून ही घटना घडली. मी लेखी स्वरूपात माफी मागतो. कृपया तुमचा पत्ता द्या,” असे सांगितले. मात्र, आपल्या मुलाशी झालेल्या कथित गैरवर्तनामुळे संतप्त झालेल्या पालकांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला.
या प्रकरणी संबंधित पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांच्याविरुद्ध नगर तालुका (ग्रामीण) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, घटनेमागील सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.
तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांत विविध शाळांमध्ये माकडांनी घुसून विद्यार्थी व शिक्षकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये एकलव्य विद्यालयातील एका शिक्षकासह कमला नेहरू विद्यालयातील तीन विद्यार्थी आणि डी.आर. हायस्कूलमधील एका विद्यार्थ्याला दुखापत झाली आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये चिंता वाढली असून शाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने नागरिकांना आणि शाळा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.






