(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आपल्या बोल्ड स्टाईल आणि स्पष्टवक्त्या वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी कंगना रणौत सध्या तिच्या आगामी देशभक्तीपर ॲक्शन-ड्रामा चित्रपट ‘भारत भाग्य विधाता’मुळे चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून, त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ‘भारत भाग्य विधाता’ प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत. दरम्यान, आता कंगना रणौतचे एक वक्तव्य समोर आले असून, त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
‘भारत भाग्य विधाता’च्या चर्चेदरम्यान, कंगना रणौतने नुकतीच तिची सह-अभिनेत्री गिरिजा ओकसोबत एक मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान, गिरिजा ओकने तो प्रसंग आठवला जेव्हा तिला सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यावर कंगनाने गंमतीने उत्तर दिले, “कृपया आमच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तुमच्या सौंदर्याचाही वापर करा.”
मुलाखतीदरम्यान, गिरीजा ओकच्या निळ्या साडीतील लूकचा उल्लेख होताच कंगना रणौतने कुतूहलाने विचारले, “हे निळ्या साडीचं काय प्रकरण आहे? मीसुद्धा ऐकलंय.” यावर गिरीजा ओकने तिला संपूर्ण प्रसंग समजावून सांगितला. ती म्हणाली की, तिच्या एका पॉडकास्ट मुलाखतीतील क्लिप अचानक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. इतकी की त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आणि शेअर्सचा अक्षरशः “पाऊस” पडला.
गिरीजाने पुढे सांगितले की, त्या व्हायरल क्लिपमागे कोणतेही खास कारण किंवा लॉजिक नव्हते. अनेकांनी तिच्या दिसण्यावरून कमेंट्स करायला सुरुवात केली होती. त्यामुळे तिला जाणवले की, हे काही तिचे वैयक्तिक यश नाही.“मी कशी दिसते, यात माझं काहीही योगदान नाही. हे मला माझ्या आई-वडिलांकडून मिळालेलं आहे,” असे स्पष्ट मत तिने व्यक्त केले.
गिरीजाच्या या उत्तरानंतर कंगना रणौत म्हणते, “मी खूप खुश आहे की तू माझ्या चित्रपटात काम करतेयस. कृपया तुझ्या सौंदर्याचा वापर करून या चित्रपटाला प्रमोट कर.” यावर गिरीजा हसत प्रतिक्रिया देते आणि वातावरण हलकं-फुलकं राहतं.
दरम्यान, ‘नॅशनल क्रश’ या टॅगचा योग्य प्रकारे वापर होत नसल्याची टिप्पणी मुलाखतकर्त्याने केल्यानंतर गिरीजाने आपली स्पष्ट भूमिका मांडली. ती म्हणाली, “एखादी गोष्ट नॅशनल होण्यासाठीचं प्रमाणपत्र कुठे मिळतं, ते मला सांगा. त्यांनी (कंगना) नॅशनल ओळख मिळवलेली आहे, ते मी मान्य करू शकते. पण मला ‘नॅशनल क्रश’ म्हणण्यात काहीच अर्थ वाटत नाही.”
कंगना रणौतचा आगामी चित्रपट
कंगना रणौतचा आगामी चित्रपट, “भारत भाग्य विधाता,” हा २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सत्य घटनांवर आधारित एक थ्रिलर ड्रामा आहे. मनोज तापारिया यांनी दिग्दर्शित आणि लिखित केलेला हा चित्रपट, मुंबईतील कामा आणि अल्ब्लेस रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांच्या शौर्याची कथा सांगतो. असे म्हटले जाते की, जेव्हा दहशतवादी संपूर्ण शहरात धुमाकूळ घालत होते, तेव्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुमारे ४०० रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही.






