शेतीसाठी नियमित व पुरेशा वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी करमाळा शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. दत्त मंदिरापासून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात तालुक्यातील शेतकरी, वीज ग्राहक आणि विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चानंतर आयोजित सभेत बोलताना आमदार पाटील म्हणाले, “करमाळा हा दुष्काळी तालुका असून शेती मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठ्यावर अवलंबून आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांना केवळ चार तास वीज मिळत आहे. दुसरीकडे इंदापूर तालुक्यात आठ तास वीज दिली जाते. एकाच प्रदेशातील दोन तालुक्यांमध्ये असा भेदभाव का केला जात आहे, याचे उत्तर शासनाने द्यावे.”
ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे पीक वाचवायचे असेल तर किमान सहा ते आठ तास अखंडित वीजपुरवठा करणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन करमाळा तालुक्यातील वीजपुरवठा वाढवावा. यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मोर्चामध्ये श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, जेऊरचे सरपंच पैलवान पृथ्वीराज पाटील, कंदरचे सरपंच मौला मुलाणी, पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास रोकडे, आदिनाथ कारखान्याचे संचालक महिंद्र पाटील, राजाभाऊ कदम, देवानंद बागल, दत्ता सरडे यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्च्याचे नियोजन व सूत्रसंचालन आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले.






