संग्रहित फोटो
बारामती/अमोल तोरणे : दुधात पाणी मिसळूनही न थांबलेला भेसळीचा खेळ आता थेट रासायनिक पदार्थांपर्यंत पोहोचला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकाराविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईनंतर काही दूध संघांच्या दूध संकलनात घट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे “दूध उत्पादन घटले की आतापर्यंत दुधाच्या नावाखाली सुरू असलेली भेसळ थांबली?”
दुधातील फॅट आणि एसएनएफचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. दूध अधिक काळ टिकावे, त्याचे प्रमाण वाढावे किंवा गुणवत्ता तपासणीमध्ये ते उत्तीर्ण व्हावे, यासाठी आरोग्यास घातक पदार्थांचा वापर होत असल्यास हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. दूध विकून नफा कमावणाऱ्यांनी नागरिकांना विष पाजण्याचा परवाना घेतलेला नाही, असा संताप आता व्यक्त होत आहे.
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे दूध संकलन केंद्रांपासून दूध संघांपर्यंत सुरू असलेल्या व्यवहारांची तपासणी होत आहे. संशयास्पद दूध नाकारले जात असल्यास त्याचा परिणाम संकलनाच्या आकडेवारीवर होणे स्वाभाविक आहे. मात्र, या घटत्या संकलनाचा नेमका संबंध दूध उत्पादकांच्या उत्पादनाशी आहे की भेसळीवर बसलेल्या चापाशी, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
कारवाई झाली की आकडे का घटतात?
जर दूध शुद्ध असेल, तर तपासणीला घाबरण्याचे कारण काय? आणि दूध संकलनात घट होत असेल, तर त्यामागील कारणे पारदर्शकपणे जनतेसमोर आणण्याची जबाबदारी संबंधितांची आहे. गुणवत्तेच्या तपासणीला विरोध करणारे कोण आहेत, त्यांना कोणाचा वरदहस्त आहे आणि भेसळीच्या या साखळीचा खरा सूत्रधार कोण? याचा शोध घेणे आवश्यक आहे. दूध हा केवळ व्यवसाय नाही; तो लाखो कुटुंबांच्या आरोग्याशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे दुधात रसायने मिसळणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करावेत. संबंधित दूध संकलन केंद्रे, वाहतूकदार आणि दोषी दूध संघांचीही जबाबदारी निश्चित करावी.
हे सुद्धा वाचा : दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या, धक्कादायक कारणही आलं समोर; चौघांना अटक
मुख्यमंत्री साहेब कोणालाही पाठीशी घालू नका
मुंढेंची कारवाई थांबविण्याऐवजी ती आणखी व्यापक करा. दूध कमी झाले तरी चालेल; पण नागरिकांच्या घरात ‘दुधाच्या नावाखाली विष’ पोहोचता कामा नये! दुधात भेसळ करणाऱ्यांना संरक्षण देणारेही तितकेच दोषी आहेत.आता दूध व्यवसायातील ‘पांढऱ्या’ आवरणाखालील काळा धंदा उघडकीस आणण्याची वेळ आली आहे. दूध भेसळी विरोधात तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये बड्या राजकीय नेत्यांची नावे चर्चेत आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काहींनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. मात्र सर्वसामान्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या अशा भेसळखोरांना पाठीशी घालू नये, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.






