फोटो सौजन्य - Social Media
खामगाव, ब्यूरो : खामगाव-टेंभूर्णा मार्गाची अवघ्या तीन महिन्यांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली असतानाही रस्त्याची अवस्था पुन्हा जैसे थे झाली आहे. मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, निकृष्ट कामाचा आरोप केला आहे.
Maharashtra Rain Alert: दोन दिवस महाभयंकर संकट! कोकणात धुमशान तर घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार…
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मागील वर्षी या मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले होते. यापूर्वी दुपदरी असलेला हा रस्ता चौपदरी करण्यात आल्याने वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही महिन्यांतच रस्त्याची दुरवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित विभागाने सुमारे तीन महिन्यांपूर्वी रस्त्याची पुन्हा दुरुस्ती केली होती. मात्र, ही दुरुस्तीही निकृष्ट दर्जाची झाल्याचे आता समोर आले आहे. अल्पावधीतच रस्त्यावर दोन ते तीन ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असते. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी तसेच रस्त्याची कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या रेल्वे अंडरपासचे काम सुरू असल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे फाटक वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक ग्रामीण पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या पर्यायी रस्त्यावर वळविण्यात आली आहे. दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने हजारो नागरिकांना दररोज याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता चिखलमय
शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले असले, तरी मातीमिश्रित मुरूम टाकून करण्यात आलेल्या कामामुळे पावसात संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले; मात्र, त्यामध्ये दर्जेदार साहित्याचा वापर न करता केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.






