मुंबई – काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज (१७ ऑक्टोबर) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते काँग्रेसमध्ये असताना झालेल्या अशाच एका निवडणुकीची आठवण सांगितली आहे. “मीही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढलो होतो, पण मी हरलो,” अशी माहिती शरद पवारांनी दिली. तसेच त्यावेळी सीताराम केसरी या बिहारच्या नेत्यांना गांधी कुटुंबाचा पाठिंबा होता, असंही त्यांनी नमूद केलं.
शरद पवार म्हणाले, “मी काँग्रेसमध्ये असताना बिहारचे नेते सीताराम केसरी यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढलो होतो आणि मी हरलो होतो. तेव्हा सीताराम केसरींना गांधी घराण्याचा पाठिंबा मिळाला होता. तेव्हापासून आजपर्यंत निवडणूक झाली नाही.”
शरद पवार पुढे म्हणाले, “काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे निवडून येतील त्यात मल्लिकार्जून खरगेंचं नाव दिसत आहे. खरगे आणि आम्ही संसदेत एकत्र काम करतो. अनेक वर्षांपासून पक्षात संघटनात्मक काम करणारी व्यक्ती म्हणून खरगेंचा आम्हाला परिचय आहे. त्यामुळे साहजिक आहे की अशी व्यक्ती त्या ठिकाणी आली तर त्याचा परिणाम संघटनेच्या दृष्टीने चांगला होईल.”