डोंबिवलीतील मानपाडा माणगाव परिसर जलमय; आमदार राजेश मोरे यांनी पाण्यात उतरून केली पाहणी
डोंबिवलीतील कल्याण-शीळ मार्गालगत असलेल्या मानपाडा–माणगाव परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून रस्त्यांवरही पाणी साचल्यामुळे वाहतूक आणि दैनंदिन हालचालींवर परिणाम झाला आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी स्वतः पाण्यात उतरून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
स्थानिकांनी गेल्या तीन दिवसांपासून साचलेल्या पाण्यामुळे होत असलेल्या गैरसोयी आणि नुकसानीची माहिती आमदारांना दिली. पाहणीनंतर आमदार राजेश मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. परिसरातील पाण्याचा निचरा करून नागरिकांना दिलासा मिळावा, तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात केवळ एक तासाच्या पावसात अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच मुद्द्यावर सोमवारी झालेल्या महासभेत शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांच्या घरात पाणी शिरलं तर आम्ही अधिकाऱ्यांना बसू देणार नाही असा इशारा देखील कुणाल पाटील यांनी दिला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात अधूनमधून पाऊस पडत असून, अल्प पावसातच अनेक भागांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. कल्याण पश्चिमेतील नवनाथ नगरसह विविध परिसरांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.






