एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केले आहे. (फोटो - सोशल मीडिया)
अमरावती : अमरावतीमध्ये विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण झाले. मुंबई ते अमरावती असे पहिल्या विमानाचा प्रवास होऊन यशस्वीरित्या दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या सरकारने प्रगती केली असून ही प्रगती अजूनही सुरु आहे, आता फक्त पायलटाच्या खुर्चीमध्ये बदल झाला असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
अमरावती विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आमच्या आधीच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प व योजना बंद होत्या. मात्र आम्ही (महायुती) सत्तेत आलो आणि राज्याच्या विकासाचं, कल्याणकारी योजनांचं टेकऑफ झालं, मी त्या विमानाचा पायलट (वैमानिक) होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे हे माझे को-पायलट (सह-वैमानिक) होते. आता देवेंद्र फडणवीस आमचे पायलट आहेत. मी व अजित पवार को-पायलट आहोत. केवळ आमची खुर्ची बदलली आहे. मात्र, विकासाचं विमान तेच आहे, इंजिनही तेच आहे. आता ते अधिक गतीने धावताना दिसतंय.” असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकनाथ शिंदे यांनी आधीच्या सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, “आमच्या आधी सत्तेत असणाऱ्या लोकांना केवळ अडचणींचा पाढा तोंडपाठ होता, त्यांच्या काळात अनेक प्रकल्प रखडले होते. त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर्स लावले होते. मात्र, आम्ही सत्तेत आल्यावर सगळे स्पीड ब्रेकर्स हटवले. आता आपल्याला बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे जायचं आहे. राज्यात आता अनेक प्रकल्प निर्माण होत आहेत. विमानतळामुळे अमरावतीचा विकास होतोय. या विमानतळामुळे नागरिक व शेतक-यांचा मोठा फायदा होणार आहे” असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अमरावतीच्या विकासामध्ये हे विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्या भागात चांगली वाहतूक व्यवस्था असते, जिथे रेल्वे व विमानसेवा उपलब्ध असते तिथला विकास जलदगतीने होतो. राजाराम महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर विमानतळाचा विस्तार आपण केला आहे. ते आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होत आहे. विमानसेवा सुरू व्हावी अशी अमरावतीकरांची मागणी होती. ती मागणी आपण पूर्ण केली आहे. सध्या मर्यादित विमानफेऱ्या असल्या तरी जसजशी मागणी वाढेल तसतशी या विमानतळाची क्षमता व विमानफेऱ्या वाढवल्या जातील, हे विमानतळ अमरावतीकरांसाठी गेमचेंजर ठरणार आहे.