MLC Election : साताऱ्याच्या मतांवर आता विजयाचे गणित अवलंबून; धैर्यशील कदमांच्या प्रवेशाने निवडणुकीत रंगत
सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचत असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. मतदारसंख्येच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या निवडणुकीत सातारा जिल्हा निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षांनी आपले राजकीय लक्ष साताऱ्याकडे केंद्रित केले आहे.
या मतदारसंघात एकूण ८९५ मतदार आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ४७२ तर सांगली जिल्ह्यातील ४२३ मतदारांचा समावेश आहे. साताऱ्यातील मतदारांची संख्या अधिक असल्याने विजयाचा मार्ग मोठ्या प्रमाणात साताऱ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या मतदानावर अवलंबून राहणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने साताऱ्यातील धैर्यशील कदम यांना उमेदवारी देत महत्त्वाची राजकीय चाल खेळली आहे. कदम यांनी सोमवारी सांगली येथे समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थानिक पातळीवरील त्यांचा संपर्क, संघटनात्मक कामकाजातील सहभाग आणि सातारा जिल्ह्यातील प्रभाव लक्षात घेऊन भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचे मानले जात आहे.
लाडकी बहीण योजनेतून तब्बल १.२५ कोटीहून अधिक महिलांना अपात्र, सुप्रिया सुळेंचा खळबळजनक दावा
महायुतीकडून साताऱ्याला दिलेले प्राधान्य लक्षवेधी ठरत आहे. जिल्ह्यात विविध पक्षांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य असल्याने मतदानाचे गणित गुंतागुंतीचे बनले आहे. त्यामुळे पक्षीय निष्ठेबरोबरच उमेदवाराची प्रतिमा आणि वैयक्तिक संबंध यांचाही निकालावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडूनही सक्षम उमेदवार मैदानात उतरविण्याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. विरोधकांनी ताकदीचा उमेदवार दिल्यास निवडणूक एकतर्फी न राहता चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत मतांचे विभाजन, अपक्षांची भूमिका आणि संभाव्य क्रॉस व्होटिंग याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व
सांगली-सातारा मतदारसंघातील ही निवडणूक केवळ विधानपरिषदेपुरती मर्यादित राहणार नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही तिच्याकडे महत्त्वाच्या राजकीय चाचणीच्या स्वरूपात पाहिले जात आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जानंतर सुरू होणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीत साताऱ्यातील मतदारांचे महत्त्व अधिकच वाढले असून, याच मतांवर विजयाचे अंतिम समीकरण ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.






