(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांसाठी महापौर अजीव पाटील, आमदार स्नेहा दुबे, आमदार राजन नाईक यांच्यासह जिल्ह्यातील इतरही लोकप्रतिनिधींनी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली होती. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी निश्चित करून मदतीची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असून त्याचा तपशील जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. या निर्णयामुळे पूरग्रस्त नागरिकांना आर्थिक पुनर्वसनासाठी मोठा आधार मिळणार आहे.
पूरामुळे स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना कपडे आणि घरगुती वस्तूंच्या नुकसानीपोटी प्रत्येकी १० हजार रुपये, म्हणजेच एकूण २० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासाठी घर सलग ४८ तास पाण्यात बुडालेले असण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.
पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी १ लाख ५० हजार रुपये, तर अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी नुकसानीच्या प्रमाणानुसार १५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. घोषित झोपडपट्टीतील पात्र झोपड्यांच्या नुकसानीसाठी १५ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
वसई-विरारमधील हजारो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते. त्या काळात आम्ही प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष मदतीची मागणी केली होती. राज्य शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेत पूरग्रस्तांसाठी विशेष मदत जाहीर केली, याबद्दल मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार. ही मदत नागरिकांना पुन्हा उभे राहण्यासाठी निश्चितच मोठा आधार ठरेल, असं विधान महापैर अजीव पाटील यांनी केले.
दुकानदार, टपरीधारक, हस्तकला व हातमाग कारागीर, बारा बलुतेदार, मच्छीमार व पशुपालकांनाही विशेष आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. दुकानदारांना प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के किंवा कमाल ५० हजार रुपये, तर टपरीधारकांना १० हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. मृत दुभत्या जनावरासाठी ४० हजार रुपये, पूर्ण नुकसान झालेल्या मच्छीमार बोटीस २५ हजार रुपये तसेच जाळे व कुक्कुटपालनाच्या नुकसानीसाठीही स्वतंत्र मदतीची तरतूद करण्यात आली आहे.






