(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
प्रत्येक भाजीमध्ये आवर्जुन आढळतो तो कांदा आणि टोमॅटो. पण आता स्वयंपाकघरातील रोजचा पदार्थ असलेल्या टोमॅटो लोकांच्या बजेटवर पुन्हा एकदा परिणाम करणार आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये टोमॅटोच्या किमती सातत्याने वाढत आहेत. हवामानाची परिस्थिती, तीव्र उष्णता आणि मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब यामुळे टोमॅटोच्या पिकावर गंभीर परिणाम झाला आहे. यामुळेच त्याचा परिणाम आता बाजारात दिसून येत आहे, जिथे टोमॅटोच्या किमती सातत्याने वाढत आहेत.
‘या’ बँकेत तुमचं तर खातं नाही ना? RBI कडून मोठा दणका; ठोठावला लाखो रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय?
प्रमुख उत्पादक राज्यांमधून टोमॅटोचा पुरवठा कमी झाल्यामुळे, टोमॅटोने बराच भाव खाल्ला आहे त्यामुळे त्याचे दरही तितकेच वाढताना दिसत आहेत. अहवालानुसार, बाजारातील टोमॅटोच्या किरकोळ किमती गेल्या महिन्याच्या तुलनेत १६% आणि गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २३% नी वाढल्या आहेत. त्यामुळे, जर तुम्ही रोजच्या भाजीच्या पदार्थांमध्ये टोमॅटो वापरत असाल, तर येत्या काही दिवसांत तुमच्या स्वयंपाकघरातील बजेटमध्ये पूर्वीपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो.
कडक उन्हाळा आणि त्यानंतर उशीराने सुरु झालेला मान्सून या सगळ्याचा फटका भाजीपाल्याला बसला. उन्हाळ्याच्या हंगामात कमी झालेली लागवड आणि अनेक प्रमुख उत्पादक राज्यांमधील खराब हवामानामुळे, येत्या काही महिन्यांत टोमॅटो अधिक महाग होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षीच्या तुलनेत टोमॅटोचे एकूण उत्पादन वाढणार आहे. परिणामी, टोमॅटोचा भाव १०० च्या पुढे जाईल की काय, अशी चिंता आता लोकांना वाटत आहे.
याव्यतिरिक्त, टोमॅटोचे पीक हवामानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. अनेकदा असे दिसून येते की, जर प्रमुख उत्पादक राज्यातील पिकांवर पाऊस, उष्णता किंवा इतर घटकांचा परिणाम झाला, तर बाजारातील पुरवठा कमी होतो. यामुळेच जून ते ऑगस्ट आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यांत टोमॅटोच्या किमती अनेकदा वाढतात.
वाढलेल्या टोमॅटोचा परिणाम आता केवळ स्वयंपाकघरातच नाही, तर व्यवसायांवरही जाणवत आहे. विशेषतः हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायांनी मोठी आर्थिक अडचण टाळण्यासाठी टोमॅटोचा वापर कमी केला आहे.






