संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आहे. शिवाजीनगर भागात सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचे २ लाख ६० हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. याबाबत रितेश प्रधान (वय २३, रा. जगताप नगर, थेरगाव) यांनी तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रधान हे मेट्रो कंपनीत सिक्युरिटी सुपरवाइजर म्हणून काम करतात. पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरू असताना चोरट्यांनी कामगार पुतळा भागातून अडीच लाखांचे बांधकाम साहित्य चोरून नेले. ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान हा प्रकार घडला. सहायक निरीक्षक राजकुमार केंद्रे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, यापूर्वीही मेट्रो मर्गिकेवरील साहित्य चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. शिवाजीनगर, चतुशृंगी तसेच खडकीत अशा घटना घडल्या आहेत. आतापर्यंत चोरट्यांनी मेट्रो मर्गिकेच्या कामाच्या ठिकाणावरून लाखोंचे साहित्य चोरून नेले आहे. त्यामुळे वाढत्या चोरीच्या घटना आणि येथील कमकुवत सुरक्षा व्यवस्था देखील याला कारण ठरत आहे.
रविवार पेठेतील वस्त्रदालनात चोरी
रविवार पेठेतील कापडगंज परिसरात मोठे कापड दुकान आहे. हे दुकान देखील चोरट्यांनी फोडून १ लाख ६८ हजारांची रोकड आणि लॅपटॉप असा १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे. याबाबत गोविंद राजाराम मुंदडा (वय ६५, रा. गंगाधाम, मार्केट यार्ड) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुंदडा यांचे कापडगंज परिसरात साडी विक्रीचे दुकान आहे. दुकान बंद असताना चोरट्यांनी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्यातील रोकड आणि लॅपटॉप चोरुन पोबारा केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिवराज हाळे करत आहेत.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.