ठाणे: भिवंडीच्या ईदगाह झोपड्पट्टीजवळील खाडीत एका महिलेचे शीर सापडले होते. या घटनेचा उलगडा भोईवाडा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी २४ तासात मृत महिलेची ओळख पटवून ४८ तासात आरोपीला अटक केली आहे.
Bhayander News : गुन्हेशाखेची मोठी कारवाई ; अंमली पदार्थ रॅकेटमध्ये 20 वर्षीय तरुणाला केली अटक
नेमकं काय प्रकरण?
30 ऑगस्टला भिवंडी शहरातील खाडी लगतच्या ईदगाह झोपडपट्टी जवळील दलदलीत एका महिलेचे शीर आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी २४ तासात महिलेची ओळख पटवली असून ४८ तासात हत्या करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. ज्या महिलेचा शीर सापडला त्या मृत महिलेचे नाव परवीन उर्फ मुस्कान वय 26 असे आहे. तिची निर्घृण हत्या दुसरं तिसरं कोणी नसून तिचा पती आहे. या गुन्हयात पती तहा इम्तियाज अन्सारी याला अटक केली आहे.
आरोपीला पकण्याचे मोठे आवाहन भोईवाडा पोलिसांसमोर होते. भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांसह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद कुंभार व त्यांच्या पोलिस पथकातील पोलिसांनी ईदगाह झोपडपट्टीत माहिती घेण्यास सुरवात केली. त्यामध्ये येथील एक महिला दिसत नसल्या बद्दल माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करीत चौकशीस सुरवात केली. तेव्हा परवीन उर्फ मुस्कान या महिलेचा तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर माहिती घेतली असता तिचा चालक पती घरी नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी शोध घेत त्याला 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी ताब्यात घेत कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर पती तहा याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी नेऊन हत्या केलेल्या पत्नीचे धड कोठे आहे त्याबाबत शोध घेण्यासाठी खाडी पात्रात बोटीच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला.
हत्या करण्याचे कारण काय?
पती पत्नीमध्ये नेहमी वैयक्तिक संशयावरून वाद होत असतात. कधीकधी हाणामारी सुद्धा होत असते. २८ ऑगस्ट रोजी मृत महिला परवीन घरातून निघून गेली होती. त्यामुळे वाद झाला होता. त्याच रागातून पती तहा इम्तियाज अन्सारी याने २९ ऑगस्ट रोजी पत्नी परवीन हिची क्रूरपणे हत्या केली. त्यावेळी त्याने पत्नीचे शिर धडापासून वेगळे करीत शरीराचे दोन तुकडे करीत ते खाडीत भरतीचे पाणी वाढले असताना त्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
शीर मिळाला पण धड अजूनही गायब?
मंगळवारी घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह फॉरेन्सिक पथक व श्वान पथकास पाचारण करून शोध घेण्याचा प्रयत्न केला.पण अजूनही धड न सापडल्याने खाडी लगतच्या पोलिस ठाणे यांना पत्राद्वारे या बाबत कळवण्यात आलं. दरम्यान आरोपी पती तहा इम्तियाज अन्सारी या भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्याला 11 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.