Photo Credit- Social Media महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे जोरदार राजकारण रंगले आहे. यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र प्रत्यक्षात एकतर्फी निकाल लागल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मात्र निकालानंतर देखील राज्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी होताना दिसल्या. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला होता. मात्र त्यांनी इतर खात्यांच्या केलेल्या मागण्यांमुळे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु होते. आता मात्र देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळातील गटनेते पदी एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट आहे.
महायुतीने आता सत्तास्थापनेचा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रमुख नेत्यांसह राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. आता उद्या (दि.05) आझाद मैदानावर मुंबईमध्ये महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची मुंबईमध्ये जय्यत तयारी सुरु असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील एक जल्लोष दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्यामुळे भाजप नेत्यांमध्ये देखील उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असले तरी एकनाथ शिंदे हे काय म्हणून शपथ घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. एकनाथ शिंदे हे आता मुख्यमंत्रिपदानंतर उपमुख्यमंत्री होणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. याबाबत शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधून या राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. महायुतीमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे सत्तास्थापनेचे स्वरुप असेल असे मत अजित पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे कोणते पद स्वीकारणार याची उत्सुकता लागली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मी पक्षप्रमुख म्हणून काम करेन आणि संघटना वाढवेन असं एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले होते. मात्र आम्हा सगळ्या आमदारांची इच्छा आहे की त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं. एकनाथ शिंदे यांनी प्रशासनात जावं अशी आमची इच्छा आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं हा आमचा आग्रह राज्याच्या हितासाठी आहे, असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे उदय सामंत म्हणाले की, मंगळवारी आम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तसंच देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. शिवसेनेचे जेवढे आमदार आणि खासदार आहेत त्या सगळ्यांची इच्छा आहे की एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पाहिजे असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता काळजीवाहू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? याची उत्सुकता संपूर्ण राज्याला आहे.