(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील कमळी मालिका नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते.या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. लवकरच ही मालिका एक मोठे वळण घेताना दिसणार आहे. मालिकेतील नायक नायिका जितके लक्ष वेधून घेतात, तितकेच मालिकेतील खलनायक – खलनायिका देखील लक्ष वेधून घेत असतात. खलनायक काहीतरी मिळवण्यासाठी नेहमी इतरांना त्रास देतात, तर नायक – नायिका नेहमी त्यातून मार्ग काढून, त्रास देणाऱ्यांना धडा शिकवतात.
असेच काहीसे कमळी या मालिकेत पाहायला मिळते. कमळी ही छोट्या गावातून मुंबईत आलेली मुलगी आहे. चांगले शिक्षण घेऊन तिला तिची स्वप्ने पूर्ण करायची आहेत. पण जेव्हापासून ती मुंबईत आली आहे, तेव्ही तिला कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. मालिकेत दाखवल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वीच वार्षिक परीक्षा झाली, ज्यात कमळीला चांगले मार्क मिळू नयेत, म्हणून अनिका, कामिनी, रागिणी हे सगळे मिळून अनेक प्रयत्न करतात. मात्र कमळी येणाऱ्या प्रत्येक संकटातून बाहेर पडली. आता झी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रोमोमध्ये सुरूवातीला ऐकायला मिळते की आव्हानहांना भिडणाऱ्या बेधडक कमळीचा आज निकाल लागणार, कमळी छत्रपती शिवाजी महारांजाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी राहिलेली दिसत आहे. ती म्हणते, “ज्याच्यासाठी गाव सोडून मुंबईत आलो, त्याच्या पहिल्या पायरीचा आज निकाल लागतोय.आशीर्वाद असू द्या.”
प्रोमोमध्ये पुढे दाखवलं जातं की अनिका म्हणते, “कमळी, आता तुझा प्रवास संपणार. एक वर्ष आमच्या डोक्यावर नाचलीस. आता तू नापास होऊन थेट गावाला निघून जाणार.” यानंतर शिक्षणमंत्री विश्वंभंर राजेशिर्के यांची एन्ट्री होते. ते निकाल जाहीर करत म्हणतात, “मुंबई विद्यापीठात पहिल्या आलेल्या त्या विद्यार्थिनीचं नाव आहे….” हे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर निकाल जाणून घेण्याची उत्सुकता आणि तणाव स्पष्टपणे दिसतो.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने “खुद्द शिक्षणमंत्री जाहीर करणार महाराष्ट्राचा महानिकाल” अशी कॅप्शन दिली असून प्रेक्षकांनी या प्रोमोवर अनेक कमेंंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता येणाऱ्या भागात नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






