India Summons US Diplomat: ओमानच्या आखातात ३ भारतीय खलाशांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे राजदूत जेसन मीक्स यांना झापले
परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागरी व्यापारी जहाजांवर प्राणघातक शक्तीचा वापर करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. अशा प्रकारच्या हिंसक घटना आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच त्याचा प्रादेशिक स्थैर्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी भारताने अमेरिकेकडे केली आहे.
दरम्यान, या कारवायांमध्ये तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याचे भारत सरकारने मान्य केले आहे. भारतीय खलाशांचा समावेश असलेल्या तीन जहाजांना अमेरिकन नौदलाने लक्ष्य केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. नागरिकांचे जीवितहानी टाळणे शक्य असताना अशा घटना घडल्याबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील गेल्या चार दिवसांत अमेरिकन सैन्याने सलग तीन जहाजांवर कारवाई केली. ८ जून रोजी पलाऊच्या ध्वजाखालील ‘मारिवेक्स’ या तेलवाहू जहाजावर पहिला हल्ला झाला. या जहाजावर २४ भारतीय खलाशी होते. हल्ल्यानंतर जहाज निकामी झाले असले तरी सर्वांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले. १० जून रोजी पलाऊच्या ‘सेटेबेलो’ या दुसऱ्या तेलवाहू जहाजावर हल्ला झाला. या हल्ल्यात २४ भारतीयांपैकी तीन खलाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा ११ जून रोजी गिनी-बिसाऊच्या ध्वजाखालील ‘जलवीर’ या तेलवाहू जहाजावर तिसरी कारवाई करण्यात आली. या जहाजावर २० भारतीय खलाशी होते.
रणधीर जयस्वाल म्हणाले की, या तीन जहाजांपैकी दोन जहाजांवर अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या परकीय मालमत्ता नियंत्रण कार्यालयाने (OFC) निर्बंध लागू केले होते, तर एक जहाज नियमांचे पालन करत नसल्याचा आरोप होता. ही संस्था इराणी आणि रशियन तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांवर निर्बंध लावण्याचे काम करते. मात्र, निर्बंधांची अंमलबजावणी करताना नागरी जहाजांवर प्राणघातक कारवाई करणे योग्य नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे






