‘लंडनला पाठवलेल्या मुलींसोबत नेमकं काय घडलं?’ डहाणू प्रकरणी चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप
आरोपीला अद्याप जामीन मिळालेला नसून केवळ काही कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी ग्वाही दिल्याचेही त्यांनी सांगितले. फसवणुकीला बळी पडणारी कुटुंबे प्रामुख्याने मारवाडी आणि जैन समाजातील असल्याचा दावा करत, ज्या कुटुंबांतील मुली साध्वी झाल्या आहेत अशाच मुलींना स्टुडंट व्हिसाच्या माध्यमातून लंडनला पाठविण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या मुलींना परदेशात नेल्यानंतर त्यांच्यासोबत नेमके काय घडत आहे, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. या सर्व व्यवहारासाठी निधी कुठून आला, त्यामागे कोण आहेत, याचा तपास येत्या काळात होईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.
पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून एसआयटीची स्थापना करण्यात येणार असून या प्रकरणातील प्रत्येक संबंधित व्यक्तीची चौकशी केली जाईल. हे प्रकरण रॅकेटचे आहे की मानव तस्करीचे, याचाही तपास एसआयटीमार्फत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भागात अशा आणखी किती घटना घडल्या असतील याची माहिती अद्याप नसली, तरी अवघ्या अर्ध्या तासात चार तत्सम प्रकरणे आपल्या निदर्शनास आल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला. मुख्यमंत्री या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून ते उध्वस्त करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज डहाणू बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला डहाणूकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले.






