रोहित पवारांच्या पंढरपूरमधील आंदोलनावर सदाभाऊ खोतांचा घणाघाती वार
खोत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणीही लढत असेल तर त्याचे स्वागतच आहे. मात्र राज्यातील शेतकऱ्यांसमोर केवळ कर्जमाफीचा प्रश्न नसून अनेक गंभीर समस्या आहेत. पुढील गळीत हंगामाची तयारी सुरू असतानाही अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची एफआरपी थकवली आहे. अशा कारखानदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रोहित पवार यांनी आपल्या आंदोलनात करावी. यासोबतच राज्यातील सहकार क्षेत्राच्या ऱ्हासाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. पूर्वीचे सुमारे २०० सहकारी साखर कारखान्यांपैकी १२५ ते ३० कारखाने खाजगी झाल्याचा उल्लेख करत, ते कवडीमोल दरात कुणी विकत घेतले याची चौकशी व्हावी आणि खाजगी झालेले कारखाने पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यातील सहकारी संस्थांमध्ये रूपांतरित करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
“गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही शेतकऱ्यांसाठी अहोरात्र संघर्ष करत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नवा भिडू आल्याचे स्वागत आहे. पण सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेला स्वतःच्या राजकारणासाठी गालबोट लावण्याचे काम रोहित पवार करत आहेत,असा आरोप खोत यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला. “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान कोणी केले?जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी दूध संघ आणि सूतगिरण्या कुणी गिळंकृत केल्या? हे राज्यातील शेतकरी जाणून आहे, असे ते म्हणाले.
पंढरपुरात रोहित पवारांचे शेतकऱ्यांसाठी ‘अन्नत्याग आंदोलन’, २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही हिताची असल्याचे सांगत खोत यांनी तिचे समर्थन केले. रोहित पवारांच्या आंदोलनावर टीका करताना त्यांनी “सौ चूहे खाके बिल्ली चली हज को” या म्हणीचा उल्लेख केला. “पवार घराणे आणि रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ‘खळ’ लुटण्याचे काम केले. त्या पापातून मोक्ष मिळवण्यासाठी ते पांडुरंगाच्या दारात जाऊन बसले आहेत,असा घणाघात त्यांनी केला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आठवण करून देताना खोत म्हणाले की, “पवार सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी आंदोलने केली. त्यावेळी ऊस उत्पादकांना १४०० रुपयांपेक्षा एक दमडी जास्त देणार नाही, अशी भूमिका याच पक्षाने घेतली होती. आम्ही पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढली, पण पवार घराण्यातील कोणीही आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. आजोबा आणि हे रोहित पवार आंदोलनाकडे डुंकूनही बघायला आले नाहीत रोहित पवारांना खरोखरच शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग करायचा असेल, तर खाजगी झालेले साखर कारखाने पुन्हा सहकारी करण्याची मागणी करावी, एफआरपी न देणाऱ्या कारखानदारांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका घ्यावी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील कथित गैरव्यवहारांबाबत आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
“तरच हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी असल्याचे आम्ही मानू; अन्यथा शेतकरी या अन्नत्याग आंदोलनाकडे नौटंकी म्हणूनच पाहतील, असा टोला लगावत सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांच्या आंदोलनावर जहरी टीका केली.






