( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. चित्रपटातील मोठी स्टारकास्ट, विनोदी कथानक आणि दमदार मनोरंजनामुळे हा सिनेमा सतत चर्चेत राहिला. मात्र, चित्रपटाच्या बजेटबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अनेक अहवालांमध्ये या चित्रपटाचं बजेट २०० ते २५० कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला होता. आता या चर्चांवर दिग्दर्शक अहमद खान यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिलं आहे.
‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत अहमद खान म्हणाले, “मी हा चित्रपट ११० कोटी रुपयांमध्ये पूर्ण केला. प्रिंट्स आणि जाहिरातींचा खर्च धरून चित्रपटाचं एकूण बजेट सुमारे १२५ कोटी रुपये झालं.”
ते पुढे म्हणाले की, चित्रपटाचं चित्रीकरण केवळ ७५ दिवसांत पूर्ण करण्यात आलं. “जर शूटिंगचे दिवस वाढले असते, तर कलाकारांचे मानधन, खानपान, तांत्रिक खर्च, एडिटिंग, प्रोसेसिंग आणि पार्श्वसंगीताचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला असता,” असं त्यांनी सांगितलं.
अहमद खान यांनी सांगितलं की, चित्रपटाच्या सेटवर स्टारकास्टसह सुमारे ९०० जण उपस्थित असायचे. अनेकदा सेटवर ५० व्हॅनिटी व्हॅन्स उभ्या असायच्या. एवढी मोठी टीम असूनही खर्चावर नियंत्रण ठेवत नियोजित वेळेत चित्रपट पूर्ण करण्यात यश आलं.
चित्रपटाच्या बजेटबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “लोक २००-२५० कोटींचं बजेट असल्याचं बोलत होते. पण हे आकडे कुठून आले, हे मला माहिती नाही. जर मी एवढा खर्च केला असता, तर ३६ वर्षांच्या अनुभवाचा काय उपयोग? हा कोणता मोठा VFX किंवा सुपरहिरो चित्रपट नाही. मोठी स्टारकास्ट म्हणजे चित्रपटाचं बजेट आपोआप वाढतं, असं नसतं.”
चित्रपटाच्या कमाईबाबत बोलताना अहमद खान यांनी आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, सॅटेलाइट, डिजिटल आणि म्युझिक राइट्समधून चित्रपटाचं संपूर्ण बजेट प्रदर्शनापूर्वीच वसूल झालं होतं. त्यामुळे कागदोपत्री चित्रपट रिलीजपूर्वीच फायदेशीर ठरला होता. त्यानंतर बॉक्स ऑफिसवरील कमाई हा अतिरिक्त लाभ ठरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.






