ऑपरेशन टायगरची ठाकरेंना धास्ती? खासदार फुटीबाबत संजय राऊतांचे मोठे विधान
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याचा दावा केला जात असून, याच ‘ऑपरेशन टायगर‘ च्या अंतर्गत ठाकरे गटातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील खासदार लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाची मान्यता मिळवण्यासाठी पत्र देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. या घडामोडींमुळे पक्षात हालचाली वाढल्या असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १४ जून रोजी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीस पाच खासदार अनुपस्थित राहिल्याने चर्चांना आणखी बळ मिळाले.
यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “शिवसेनेचा एकच गट असून तो खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. खासदार फुटू शकतात, अशा चर्चा आम्ही गेल्या दोन वर्षांपासून ऐकत आहोत. काल सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते. आज सकाळीदेखील आमचे खासदारांशी बोलणे झाले आहे.”
लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सादर करण्याच्या चर्चांबाबत विचारले असता राऊत म्हणाले, “आज उद्धव ठाकरे आणि संजय देशमुख यांच्यात काही कामानिमित्त चर्चा झाली. आणखी दोन खासदारांशीही ठाकरे यांनी संवाद साधला आहे. तरीही काही खासदार अध्यक्षांना पत्र द्यायला गेले असतील असे वाटत असेल, तर त्या पत्राचा मसुदा समोर आल्यावरच त्याबाबत बोलू.”
दरम्यान, ठाकरे गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे पक्षातील हालचाली वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ठाकरे गटातील काही खासदारांनी शिंदे गटाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटातील खासदार नेमकी कोणती भूमिका घेणार आणि पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणांमध्ये कोणते बदल होणार, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.






