Milind Deora: '2029 मध्ये वरळीचा आमदार बदलायचा'; मिलिंद देवरांचा रोख कुणाकडे?
Mumbai Politics: “येत्या 2029 सालाच्या निवडणुकीत नक्कीच बदल होणार आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांना आपण रिटायर करायचं आहे,” अशा अप्रत्यक्ष शब्दांत शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा रोख ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे असल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली आहे.
कार्यक्रमात बोलताना मिलिंद देवरा म्हणाले की, “आज येथे जमलेली गर्दी पाहून 2029 मध्ये नक्कीच बदल होणार, असा विश्वास वाटतो. बदल म्हणजे वरळीचा आमदार बदलणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे सर्वसामान्य वरळीकरांना फायदा होईल,” असा विश्वास व्यक्त केला.
मिलिंद देवरा यांनी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचेही कौतुक करतना देवरा म्हणाले की, “सचिन अहिर यांनी माझे वडील, माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्यासोबतही काम केले आहे. आमचे संबंध खूप जुने आहेत. आज आम्ही एकाच पक्षात आहोत, याचा आनंद आहे. सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली वरळीकरांना न्याय मिळेल. विधान परिषदेचे उपसभापती हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सचिन अहिर यांनी अलीकडेच शिंदे गटामध्ये प्रवेश केला असून त्यानंतर त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांच्या वक्तव्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघातील भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना वेग आला आहे.
सचिन अहिर हे केवळ शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेतेच नव्हते, तर मुंबईतील, विशेषतः वरळी भागातील आदित्य ठाकरे यांच्या राजकारणातील एक प्रमुख रणनीतिकार म्हणूनही ओळखले जात होते. जेव्हा आदित्य ठाकरे यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, तेव्हा वरळीची संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी अहिर यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावेळी अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. राजकीय विश्लेषकांच्या मते, अहिर यांच्या जाण्यामुळे वरळीतील आदित्य ठाकरे यांच्या राजकीय प्रभावावर परिणाम होऊ शकतो.






