कुर्ला ते वेंगुर्ला होणार सप्टेंबरमध्ये प्रदर्शित
गेल्या काही वर्षात तंत्रज्ञान, दळणवळण, आर्थिक स्थिती, शिक्षणात झालेल्या बदलांसह नव्या पिढीच्या आशा-आकांक्षाही बदलल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत एका लग्नाची रंजक गोष्ट ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटातून उलगडणार आहे.
अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून अभिनेते सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सध्या मराठी चित्रपटांचा गल्लाही चांगलाच जमलेला दिसून येत आहे. वेगवेगळ्या विषयावरील चित्रपट हे मराठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणत असल्याचेही दिसत आहे. असाच हा चित्रपट काय कमाल करणार हे आता सप्टेंबरमध्येच कळेल.
कशी असणार कथा
काही वर्षांत गावातल्या मुलांची लग्न जमणे ही एक समस्याच झाली आहे. याच संकल्पनेचा वेध “कुर्ला टू वेंगुर्ला” हा चित्रपट अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला गेला आहे. आजच्या काळातील मुला-मुलींच्या आकांक्षा, त्यांच्या पालकांची इच्छा-अपेक्षा, गाव आणि शहरातील स्थिती असे मुद्दे मनोरंजक पद्धतीने हाताळत एक धमाल गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. त्यामुळे घरोघरी असणारी कहाणीच आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. धमाल गोष्टीला मालवणी भाषेचा तडकाही आहे. प्रत्येकाचं मनोरंजन करणारी आणि प्रत्येक घराला रिलेट होणारी ही गोष्ट आहे. म्हणूनच नावापासून कुतुहल निर्माण करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी आता १९ सप्टेंबरपर्यंत वाट पहावीच लागेल यात शंका नाही.
गावाकडील कथा या मराठी माणसाची खरंतर नाळ आहे. गावाशी जोडणाऱ्या कथांशी मराठी माणूस पटकन जोडला जातो. त्यामुळे या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांच्या आता अनेक अपेक्षा असतील यात काही दुमत नाही. तर चित्रपटात तेच तेच मराठमोळे चेहरे पाहण्यापेक्षा काही वेगळे चेहरे जे मालिकेत काम करतात ते यातून दिसणार आहेत आणि त्यामुळे थोडा वेगळेपणाही प्रेक्षकांना जाणवेल.
कुर्ला ते वेंगुर्लामागील मेहनत
सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थानी “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमरजित आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरतचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजित आमले यांनी, तर दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केलं आहे.
रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी छायांकन, विजय कलमकर यांनी संकलन, अविनाश सोनावणे यांनी ध्वनिआरेखन, चंचल काळे, अमरजित आमले यांनी गीतलेखन, अक्षय खोत यांनी संगीत दिग्दर्शन, पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे तर वितरक म्हणून पिकल इंटरटेनमेंट काम पाहणार आहे.